काही वेगळी किंवा जास्त ओळख करून द्यायची गरज नाहि.
४८०० फूटापेक्ष्या जास्त उंची. सह्याद्रीमधील सर्वात जास्त चढ़ान.
सह्याद्री मधे भटकनाऱ्या भटक्याना हे नाव नक्कीच ठावुक असते. कित्येकनासाठी ते ध्येय/ स्वप्न असते. कसलेला ट्रेकरपण कुलंग चढ़ाई अगोदर एक दीर्घ श्वास घेउन सुरवात करतो. ३००० फूटापेक्ष्या जास्त खोल दरी, सरळसोट तुटलेले कड़े.
जास्त कोणी फिरकत नसल्याने वाटा रूळलेल्या नाहीत. आजू बाजुच्या दाट झाड़ीतुन आपली वाट आपणच बनावट जायची.
सप्टेम्बर २००८.
खरे तर जेव्हा कुलंग चा प्लान "ऊर्जा" ग्रुप तर्फे ऑरकुटवर(हो! तेव्हा थोबड़पुस्तक प्रसिद्ध नव्हते/ चालू झाले नव्हते. आठवत नाहि, सर्व भरवसा ऑरकुटवर) प्रसिद्ध झाला, तेव्हा "यंगस्टर" चा रतनगड प्लान होता. पण रतनगड १ दिवसाचा होता. २/३ मित्राना विचारले, कोणता चांगला आहे(जसे काही मी आंबे विकत घेत होता). सर्वानी सांगितले की रतनगड जा. पण लोक जे सांगतील त्याच्या विरुद्ध करायचे हां आमचा खाक्या. हो-हो रतनगड जातो म्हणालो आणि कुलंगसाठी नाव नक्की केले.
यंगस्टर बरोबर आधी ड्यूक्स-नोज केला असल्याने निलेशला ओळख़त होतो, पण नवीन भटके जोडायला कुलंग नक्की केलि. नेट वरून माहिती गोला करायला सुरवात केलि. याआधी नियमित कोणी गडावर जात असल्याची माहिती नव्हती, म्हणजे नेटवर मिळाली नाहि. जी मिळाली त्यातून एवढे नक्की कळले की ५ तासाचा ट्रेक आहे. एक समाधान हे होते की "उर्जा" चा यतिन त्याच्या कोलेज जीवनात इथे आलेला होता.
शुक्रवारी रात्री मुंबई सेन्ट्रल बसस्थानक गाठले. बाकीच्या भटक्यांची ओळख करून घेतली. १२ जण जमले होते. रात्री १2 ची मुंबई सेन्ट्रल- नगर बस पकडली. ट्रेकरच्या धर्माला जागून बस मध्ये गाणी म्हणायला सुरवात केली. भिवंडी येईपर्यंत बिचाऱ्या एकाही प्रवाश्याला झोप आली नसेल. नंतर आमचा पण जोश थोडा कमी झाला. दुसऱ्या दिवसाची वाटचाल बघता आम्ही पण आमचे गळे आवरते घेतले. पाहते ३/३.३० च्या आसपास घोटीला उतरलो. घोटीला बस चा थांबा नसल्याने आम्हाला हायवेवरच उतरवण्यात आले. हायवेपासून घोटी स्थानक १ किमी आतमध्ये आहे. अंधारात आमची पायपीट चालू झाली. स्थानकावर पोहोचल्यावर काही तिथेच थांबले तर बाकीचे आम्ही पुढच्या प्रवासाची सोय बघायला यतीन बरोबर भटकत होतो. शेवटी एक ४०४ टेम्पो वाला तयार झाला. त्याच्या टेम्पोमध्ये बसून आम्ही पुढे कुरुन्ग्वाडीला निघालो. आम्बेवाडीला पोहोचेपर्यंत पहाट झाली होती. आंबेवाडी पर्यंत रस्ता बरा आहे. पण पुढे कुरुन्ग्वाडीचा रस्ता बराच खराब होता. शेवटी एक ठिकाणी चिखलात गाडी अडकल्यावर आमची टेम्पोतून उतरलो. चिखलातून निघाल्यावर टेम्पो माघारी फिरला. आणि आमचा ट्रेक सुरु झाला. पाऊस नुकताच संपल्याने सर्वत्र हिरवाई दिसत होती. वाटेतील एक ओढ्यामध्ये सर्वजण फ्रेश झाले. सटरफटर खाऊन पुढे निघालो.
किशोर ने आणलेल्या दुर्बिणीतून मदनच्या नेढ्याचे उत्तम दर्शन झाले. तसेच मदनाच्या कोरीव पायऱ्यापण. पायऱ्या बघून आणि चिंचोळा मार्ग बघून जायची इच्छा झाली. पण रोपशिवाय जाऊ शकत नाही त्यामुळे पुढच्या वेळेला नक्की ठरवून मार्गाला लागलो. कुलंगला फारसे ट्रेकर्स येत नाही.(२००८ मध्ये खूप कमी, आता बरेच ट्रेक वर्षभरात होतात. अगदी पावसाळ्यामध्ये देखील एक ग्रुप कुलंग करून आलेला आहे. जे कुलंग ला जाऊन आले असतील त्यांना नक्कीच यातील धोका कळत असेल. )
त्यामुळे मळलेली अशी वाट नव्हती. कुरुंगवाडीला पोहोचल्यावर एक मार्गदर्शक(वय वर्षे ८) बरोबर घेतला आणि पुढे निघालो.
सुरवातीच्या पठारावर चालायला फारसा त्रास होत नव्हता. जसा चढ चालू झाला तशी दमछाक चालू झाली. माती मध्ये बरीच ओल होती, चिखल देखील म्हणता येईल. जरादेखील ग्रीप मिळत नव्हती, सारखे पाय घसरत होते. कोणीही बाकी राहिले नाही. सर्व जण धडपडले. या ट्रेकच्या आधी आणि नंतर परत कोणत्याही ट्रेकला माझी इतकी खराब अवस्था झाली नव्हती. इतक्या दिवसाच्या भटकंती आयुष्यामध्ये पहिल्यांदा मला उद्या उतरायचे कसे हा प्रश्न भेडसावत होता.
खडा चढ, पायवाटेवरील चिखल, शुजवरील उडालेला विश्वास, धपापलेली छाती ,मोकळ्यावर आल्यावर डोक्यावर तापणारे उन, रिकाम्या होत चाललेल्या पाण्याच्या बाटल्या, आणि यात कुलंग चढणारे आम्ही साडे बाराजण (वय वर्षे ८ अर्धे तिकीट)
१०.३०/११ वाजेपर्यंत कुलंगच्या शेवटच्या चढखाली पोहोचलो. हा चढ चढायच्या आधी थोडा आराम केला. आमच्यातील अर्ध्या तिकिटाला त्याचा मेहनताना देऊन त्याची परत-पाठवणी केली. पोटामध्ये थोडी भर घातली. बजरंगबलीचे नाव घेऊन मोहीम फत्ते करायला घेतली. १२.३० च्या आसपास गडाच्या शेवटच्या टप्पात असणाऱ्या पायऱ्याखाली पोहोचलो. इथे एक छोटीशी पहारेकऱ्यासाठी मोकळी जागा आहे. १०/१५ मिनिटात गडाच्या उध्वस्त दारावाज्यामधून प्रवेश केला. प्रवेश द्वारातून वरती आल्यावरच उजव्या हाताला गडाची मुख्य गुहा आहे, तिकडे वळलो. ५/५.३० तासाच्या वाटचालीनंतर कुलंग फत्ते झाला.
वरती पोहोचल्यावर सर्व एवढे थकले होते कि पाणी आणायला जायला पण कोणी तयार नव्हते. गुहेच्या माथ्यावरील आणि बाजूच्या खडकावर सर्वजण आरामासाठी झोपले. २०/२५ मिनिटा नंतर कोणीतरी पाणी घेऊन आला होता.मला देखील मस्त झोप लागली होती. पाणी आल्यावर शिदोर्या सोडल्या गेल्या, सर्वजण महेशने आणलेल्या चिकन आणि मासळी वर तुटून पडले. ज्यांचा शनिवार होता ते आमचे तोंड बघत राहिले. पोटभर खाणे झाल्यावर परत सुस्ती आली. तिथेच लवंडलो. तासाभराने आम्ही ५ जण गुहेच्या पुढे असणाऱ्या वाड्यासदृश बांधकामाकडे निघालो. पिण्याच्या पाण्याची टाकी इथेच जवळ आहे. येथेच उडीबाबाचा कार्यक्रमपण पार पडला. आता गडाच्या दुसर्या टोकाकडे निघालो. इथेच कुलंगवरील पाण्याचा बंधारा आहे. पुरातन काळातील बांधकाम आहे. गडाच्या वरच्या अंगाने येणारे पावसातील पाणी २ मोठ्या टाक्यामध्ये साठवायचे. आणि टाकी पूर्ण भरली कि जास्तीचे पाणी खालच्या अंगाला असणाऱ्या बांधामध्ये सोडायचे. बांध भरला कि बाकीचे पाणी पन्हाळीद्वारे दरीत सोडायची सोय आहे.
या टोकावरून मदनगड, अलंगचा सुरेख नजरा दिसत होता. सूर्यास्त बघून गुहेकडे परतीला लागलो. छोटा स्टोव असल्याने गडावर जाताना आम्ही जास्त लाकूडफाटा बरोबर नेला नव्हता. पण जशी संध्याकाळ झाली तशी थंडी वाढू लागली. मग जराशी वाळलेली झुडुपे आणि काटक्या गोळा करून गुहेकडे आलो. आमचा विचार तर मोकळ्या मैदानात झोपायचा होता, पण वाढती थंडी आणि सकाळच्या दवाची भीती होती. गुहेच्या आतमध्ये बघितले एक कोपर्यात पाणी साठलेले आणि बाकीची जमीन पण ओलं घरून होती. यावरती उपाय म्हणून आम्ही गुहेसमोर वाढलेले गवत उपटून गुहेमध्ये अंथरायला सुरवात केली. यात दुहेरी फायदा होता. आम्हाला ओल्या जमिनीपासून सुटका मिळाली असती आणि नंतर कोणी ट्रेकर आले तर त्यांना तोपर्यंत वाळलेले गवत पण आयते मिळाले असते.
चांगला फुटभर जाडीचा गवताचा थर झाल्यावर आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो. जेवण म्हणून मागि बनवायचा विचार होता, पण भूक एवढी होती कि त्याऐवजी सकाळी नाश्ताला बनणारे पोहे रात्रीच्या जेवणासाठी बनवायचे ठरले. जेवणं अगोदर चहाची तलफ भागवण्यात आली. एकीकडे जेवण बनते आहे आणि दुसरीकडे पोटातील कावळ्यांना शांत करण्यासाठी शिल्लक राहिलेले सटरफटर खात होतो. पोहे बनल्यावर थाळी मध्ये घेऊन ( नंतर थाळी धुवायचा त्रास कोण घेणार ) खाण्यापेक्ष्या एक जाड वर्तमान पत्रावर घेतले. जशी खाण्याची तयारी पूर्ण झाली, बाकीच्यांकडे न बघता सर्व भुक्कड सुटले. मुठीमुठी भरून बकाणे कोंबायला लागले. पोटभर खाल्ल्यावर शेकोटीची तयारी सुरु केली. कसेबसे ओल्या लाकडांना पेटवले आणि ट्रेक मधील खरी मजा शेकोटीभोवती सुरु झाली. गाणी, गप्पा, नकला, जुन्या ट्रेकच्या आठवणी काढत रात्र जागवत होतो. फारशी लाकडे नसल्याने लवकरच शेकोटी मंद झाली आणि थंडीचा कडाका वाढू लागल्याने झोपायची तयारी सुरु झाली.
सकाळी ६ च्या आसपास खरे तर माझी उठायची इच्छा नसतानाहि उठलो. खोटे कशाला बोलू, सूर्योदय बघायची अजिबात इच्छा नव्हती. पण निसर्गाची हाक जरा लवकरच आल्याने गुहे बाहेर आलो तर बाजूच्या दरीत हा अद्भुत ढगांचा खेळ चालू होता. एक कोपर्यातून धावत येणारे ढग कळसुबाई डोंगर रंगेमधील चिंचोळ्या वाटेतून लुप्त होत होते. ढगांची माराथोन चालू होती. बाकी भान विसरून तेच बघत बसलो. मधेच बाकीचे गुहेतील साथीदारपण सामील झाले.
थोड्याच वेळात मागि ची तयारी सुरु केली. चहा-मागि झाल्यावर गुहेतील कचरा गोळा करून परतीचा प्रवास सुरु करायला घेतला. बाटल्या रिफील झाल्यावर १०/११ च्या आसपास गड सोडला. उतरताना सांभाळून उतरणे हे एकच लक्ष असल्याने कामेराचा क्लिकक्लीकाट बंद होता. काल गडावर जाताना जेवढे टेन्शन उतरायचे आले होते, आज तसे काहीच वाटत नव्हते. फक्त पाय न घसरण्याची काळजी घेत उतरत होतो. ३.३०/४ तासा मध्ये खाली कुरुन्ग्वादी मध्ये आलो. आणि चालू झाली दमछाक करणारी डांबरी वाट. मध्ये एक ठिकाणी एक आजोबा भेटले त्यांनी एक शोर्टकट सांगितला. त्या वाटेने आंबेवाडी मध्ये येऊन दाखल झालो. तिथेच तासाभराने घोटीला जाणारी बस येऊन दाखल झाली.
१.३० तासामध्ये घोटीला पोहोचलो. घोटीहून एक काळी-पिवळी ठरवली आणि कसाराच्या मार्गाला लागलो. वेळेत ट्रेन पकडनाच्या नादात दुपारच्या जेवणाची आहुती द्यावी लागली. कसे बसे आम्हाला कसारा ट्रेन मिळाली.
काही वेगळे करण्याच्या नादात खूपच चांगला ट्रेक झाला. नवीन सोबती मिळाले. त्यासोबत या भागात येण्याचे अजून एक कारण मिळाले. अलंग-मदन